शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

राहु पितरांचा दर्शक

आपल्या ज्ञात अज्ञात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी शास्त्रकारांनी भाद्रपदमासातील कृष्णपक्षाची योजना केली आहे. या काळात कुळाचाराप्रमाणे श्राद्धाचे विहित कर्म करून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. आधुनिक काळात आपापल्या श्रद्धेप्रमाणे, सोयीप्रमाणे पितरांचे स्मरण करण्याच्या नव्या रुढी पडत चालल्या आहेत. आपल्या पूर्वजांकडून आपण संपत्ती, गुणदोष, चालीरीती, संस्कार अशा अनेक गोष्टी कळत नकळत घेत असतो. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट कर्मांमध्ये या वारशाचा वाटा असतो, त्याची कृतज्ञता म्हणून पितरांचे स्मरण करणे गरजेचे असते. जगाच्या पाठीवरील प्रत्येक धर्मात, संस्कृतीत काही ना काही प्रकारे पूर्वजांचे स्मरण केरण्याची प्रथा आहे ती यासाठी.

फलज्योतिषात राहूवरून पितामह किंवा पितर, पूर्वज पाहतात, पिढीजात शाप पाहतात. धनस्थानापासून घराणे पाहतात. या दोन गोष्टींवरून पितरांकडून आलेला वारसा दिसून येतो. पत्रिकेत राहूचे विशिष्ट योग असतील तर अशावेळी पूर्वजांचा मागोवा घ्यावा लागतो. आजच्या काळात या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवला जात नाही. मीही ह्या शक्यतांचा विचार शेवटी करत असे परंतु माझ्याकडे आलेल्या काही जातकांच्या अनुभवांनी हा विचार बदलायला लावला. त्यातील काही पुढे देत आहे. शेवटी प्रत्यक्ष ज्ञान तर्कालाही हरवते.

संकेतच्या घरात अचानक आजारपणे, अपघात, भांडणे सुरु झाली. त्यामागचे कारण सापडत नव्हते. त्याच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी चंद्र राहु युती होती, चंद्र राहु दशेत या युतीवरूनराहूचे गोचर भ्रमण सुरु होते. संकेतला मी त्यावर्षीचे श्राद्ध करण्याचे राहिले आहे का असे विचारले. संकेतच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या घरात श्राद्ध कधीच होत नव्हते, पण दरवर्षी ते पितरांचे स्मरण करून काही रक्कम देणगी म्हणून देत असत ती या वर्षी द्यायची राहिली होती. काही आर्थिक अडचणींमुळे तसे करणे शक्य झाले नव्हते. मी वर म्हणल्याप्रमाणे श्राद्ध याचा अर्थ पितरांचे स्मरण करून केलेले कर्म असा आहे; संकेतच्या पत्रिकेने मला त्या कर्मात पडलेला खंड बिनचूक दाखविला होता. ग्रहदशा आणि गोचर यामुळे हे कर्म राहून गेले की कर्म राहून गेल्याने अशा ग्रहस्थितीमुळे घरात वाईट घटना घडू लागल्या हे सांगणे अवड आहे.

संकेतचा प्रश्न लवकर सुटला. दरवेळी प्रश्न सुटतातच असे नाही. नीरजाबाईंना त्यांच्या नवऱ्याकडून आणि भावाकडून त्रास भोगावा लागत होता, त्यांच्या मुलीचा घटस्फोट होऊ घातला होता. त्यांच्या पत्रिकेत बुध राहु केंद्रयोग आणि त्यांच्या मुलीच्या पत्रिकेत बुध राहु युती होती. बुधाचा दोन्ही ठिकाणी धनस्थानाशी संबंध होता. मी त्यांना त्यांच्या घरात कोणाचा घातपाताने किंवा छळाने मृत्यू झाला आहे का हे विचारले. त्यांना आश्चर्य वाटून त्यांनी त्यांच्या आत्याने घरी होणाऱ्या छळाला कंटाळून जाळून घेतल्याचे सांगितले. बुध तरुण माणूस विशेषत: मुंजा मुलगा (मुंज होऊन लग्न न झालेला) दाखवतो. बुधावरून आत्या दिसत नाही, म्हणजे आत्याचाही छळ झाला तो अशा तरुण मुलाच्या/मुलीच्या मृत्यूचा परिपाक होता. अशावेळी मूळ कळल्याशिवाय उपाय करता येत नाही. सर्वपित्री श्राद्ध करूनही संकट टळत नाही. मी त्यांना अशा घटनेचा शोध घ्यायला सांगितला. परंतु आजवर तो शोध लागलेला नाही, भोगही संपलेले नाहीत.

सानिका आणि तिच्या नवऱ्याच्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ राहुचे षष्ठ, व्यय स्थानातून योग होते; सानिकाच्या पत्रिकेत मंगळ, राहू प्रतियुती आणि तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेत मंगळ राहु व्ययातील युती. मंगळ, राहू युती घरातील विधवा स्त्री, विशेषत: जिला घरात चांगली वागणूक मिळालेली नाही अशी, दाखवते. अशी युती जर षष्ठ, व्यय स्थानात असेल तर त्या स्रीच्या तळतळाटातून वाईट फळे मिळतात. पूर्वी घराघरातून अशा स्त्रिया असत, पण सध्याच्या काळात हे अभावाने आढळते. मी सानिकाला ही शक्यता बोलून दाखवली. तिने चौकशी केली असता तिच्या आजेसासूबाईंच्या बाबतीतच असे घडले असल्याचे आढळले. मागच्या अनुभवावरून काही वाईट घटना घडण्याआधीच तिला त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध किंवा दान किंवा इतर कर्म करण्यास सांगितले आहे.